एकापासून अनेकापर्यंत......

 

एकापासून अनेकापर्यंत......


प्रा. कश्मिरा दळी
सहाय्यक प्राध्यापिका,  भारतरत्न  डॉ. पां.वा. काणे 
संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र क.का.सं.वि. रामटेक   



         ईश्वरी तत्त्व ज्यावेळी प्रकृतीवर आभासित होते आणि विविध आकार धारण करते, त्यावेळी सर्वप्रथम स्वरूप आकारास येते ते म्हणजे त्रिमूर्ति ईश्वराच्या तीन शक्ती होत.  ज्या ब्रम्हांड , विश्व निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात.  ब्रम्हांड शब्दाचा शब्दश: अर्थ विश्व किंवा विश्वाची सुव्यवस्थित प्रणाली असा आहे. ईश्वराच्या तीन शक्तींपैकी जी शक्ती विश्व निर्माण करते त्यालाच ब्रह्मा म्हटले जाते आणि याचा निर्माणकर्ता तो ब्रह्मा होय. ज्या स्थितीत  ईश्वर सृष्टीचे पालन करतो, जगाची काळजी घेतो आणि देखभाल करतो त्यास  विष्णू म्हणतात .  विष्णू हा रक्षणकर्ता होय. ज्यात ईश्वर जगाचा संहार करतो म्हणजेच जेव्हा ते जीर्ण होते व पुढे त्याचा काहीही उपयोग नसतो त्या स्थितीतील सृष्टीचा लय होतो त्यास शिव किंवा महादेव असे म्हटले जाते. शिव हा जगाचा संहारकर्ता आहे. ज्यावेळी ईश्वर सगुण ब्रह्म  स्वरुपात प्रकाशित होतो त्यावेळी तो या तीन रूपात दिसतो.

       सृष्टी निर्माता ब्रह्मा पदार्थांना सात तत्त्वांमध्ये आकारबद्ध करतो. या तत्वांनाच इलिमेन्ट असे संबोधले जाते. * ( पाश्चात्य रसायनशास्त्रज्ञ हा शब्द निराळ्या अर्थाने वापरतात. परंतु त्या शब्दाचा पूर्वीचाच जुना अर्थ आपल्याला येथे अपेक्षीत आहे. पहिल्या दोन तत्वांना वेगवेगळी नावे दिली जातात. ज्यांना महत् बुद्धी, मूळ कारण आणि अहंकार - विभक्त करणारे तत्व, पदार्थाचे लहान कणांमध्ये विभाजन करणे म्हणजेच अणु होय. अशी नावे आपण वापरू शकतो. यानंतर उर्वरीत पाच तत्त्वे - आकाश, वायु, अग्नी, जल, पृथ्वी. यांनाच भूतादि किंवा पदार्थ असे संबोधले असून यांच्या पासूनच विश्वातील समस्त वस्तू निर्माण होतात. त्यात रजोगुण आणि सत्वगुणापेक्षा तमोगुणाचे आधिक्य असल्याने या घटकांपासून बनलेल्या झालेल्या गोष्टी प्रामुख्याने निस्तेज आणि जड असतात. पदार्थांचे आवरण जड असल्यामुळे जीव आपली आंतरीक शक्ती प्रकट करू शकत नाही.

        या तत्त्वानंतर दहा इंद्रिये निर्माण झाली. ब्रह्मदेवाच्या मनात असलेल्या या केवळ कल्पना होत्या कालांतराने त्या तत्वांच्या रूपात धारण  केल्या गेल्या. गंध, रस, रूप, स्पर्श, श्रवण ही पाच इंद्रियांची पाच केंद्रे आहेत. यांच्याशी संबंधित नासिका, जिव्हा, नेत्र, त्वचा, कान ही पंच ज्ञानेंद्रिये होत.  यानंतर ज्यांच्या द्वारे प्राणी कार्य करतात अशी कृती करणारी  पाच केंद्रे आहेत. ज्यात अनुक्रमे वाक, पाणी, पाद, पायु, उपस्थ ही कर्मेंद्रिये आहेत. यात तमोगुण व सत्वगुणापेक्षा रजोगुणाचे आधिक्य असते. त्यामुळे जीव या विषयांच्या बाबतीत इंद्रिये जास्त सक्रिय आहेत. म्हणूनच जीव आपली शक्ती अधिक प्रमाणात यांच्यामध्ये प्रकाशित करतात

      इंद्रियांनंतर ब्रह्माने आपल्या मनात इंद्रियांशी जोडलेल्या देवता आणि मन निर्माण केले. जेव्हा क्रमाने पाच ज्ञानेंद्रिये सांगितली जातात तेव्हा सहावे इंद्रिय म्हणून मनाचा उल्लेख केला जातो. तर जेव्हा दहा इंद्रिये सांगितली जातात तेव्हा अकरावे इंद्रिय मन म्हटले जाते. कारण बाहेरच्या जगातून इंद्रियांद्वारा ग्रहण केलेल्या, एकत्रित केलेल्या सर्व संवेदनांची व्यवस्था करून त्यावर विचार करण्याचे कार्य मन करते. यामध्ये तमोगुण आणि रजोगुणापेक्ष सत्वगुणाचे आधिक्य असते.

       विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावयास हवे की, हे गुण कधीही वेगवेगळे  केले जात नाहीत. परंतु कोणत्याही विशिष्ट गोष्टीच्या अस्तित्वामध्ये मात्र एक गुण दुसऱ्या गुणापेक्षा जास्त प्रबळ असू शकतो. जेव्हा तमोगुणाचे प्राबल्य असते तेव्हा त्या व्यक्तीस तामसिक म्हणतात, जेव्हा रजोगुणाचे प्राबल्य असते तेव्हा त्या व्यक्तीस राजसिक म्हणतात; जेव्हा सत्वगुणाचे प्राबल्य असते तेव्हा त्या व्यक्तील सात्त्विक म्हणतात. सर्व गोष्टी या सात्विक, राजसिक, तामसिक या तीना शीर्षकांतर्गत विभागल्या जाऊ शकतात. *[1]

    त्यानंतर ब्रम्हदेवाने ईश्वराच्या नियमांचे कार्यान्वयन करणाऱ्या पालन करणाऱ्या, जगाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या अशा देवतांना निर्माण केले. या सर्व व्यवस्थांचा ईश्वर हाच अधिपती आहे. एकमेव परमेश्वर आहे. पृथ्वीवरील राजाच्या अधिकाऱ्याप्रमाणे देव हे त्या ईश्वराचे मंत्री आहेत. विद्यार्थ्यांनी देवतांनाच ईश्वर समजण्याची चूक करू नये. आपण जसे विशिष्ट अशा जगतासाठी कनिष्ठ अधिकारी आहोत त्याचप्रमाणे देवता या ब्रह्मांडासाठी ईश्वराच्या उच्च अधिकारी आहेत.

        देवतांना कधीकधी सुर असे संबोधले जाते. याच प्रत्येक माणसाला त्याच्या * कर्मानुसार[2], फळ प्राप्त होत असल्याचे ते पाहातात. त्या देवता व्यक्तीच्या पात्रतेनुसार त्या-त्या व्यक्तीस यश आणि अपयश देतात. जो या कर्माचाच परिणाम असतो. मनुष्य  जेव्हा त्या देवतांची सेवा करू लागतो तेंव्हा त्या देवता अनेक मार्गांनी माणसांना मदत करतात. जेव्हा मनुष्य या देवतांप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची अवहेलना करतो त्यावेळी दुर्भिक्ष्य, महामारी, दुष्काळ यांसारख्या समस्या उद्भवतात. असंख्य देवता म्हणजे इंद्र, वायु, अग्नी, वरुण आणि कुबेर या पाच शासकांतर्गत विभागला गेलेला एक विशाल समूह आहे. इंद्राचा संबंध अंतरीक्षाशी, वायुचा हवेशी, अग्नीचा आगीशी, वरुणाचा संबंध जलाशी, कुबेराचा पृथ्वीशी संबंध आहे. देवतांना अनेक नावे असल्याचे आपण पुराण इतिहासात पहातो. उदा. भीमाने कुबेराचा सेवक असलेल्या यक्षाशी कसे युद्ध केले हे विद्यार्थ्यांनी वाचले असेल.

 या देवतांमध्ये रजोगुणाचे अधिक्य आहे. त्यामुळे मनु म्हणतो की, त्यांचा स्वभाव कृतीशील आहे. असु, देवतांचे शत्रू असून हे ते देवतांचा प्रतिरोध करतात किंवा निश्चेष्ट राहतात. हे तामसिक प्रकृतीचे असतात.

      त्यानंतर ब्रह्मदेवाने आपल्या मनात खनिजे वनस्पती, प्राणी आणि पुरुष निर्माण केले. अशाप्रकारे ज्यामध्ये जीवाच्या शक्तींचा उलगडा होणाऱ्या व आता ज्याला उत्क्रांती म्हणतात अशा जगाचे चित्र पूर्ण केले. जगाची उत्क्रांती किंवा जगाच्या निर्मितीच्या प्रक्रियेला संस्कृतमध्ये 'संसार' असे म्हटले जाते आणि याची तुलना सतत फिरणाऱ्या चक्राशी केली जाते ज्याच्याशी सर्व जीव बांधले गेलेले आहेत.

          अशाप्रकारे ब्रह्मदेवाने विश्वनिर्मितीच्या महान कार्यातील आपले योगदान पूर्ण केले. परंतु भौतिक वस्तूंना आकार रूपात येण्याची आणि जीवांना क्रियाशील बनण्याची आवश्यकता होती. सर्वव्यापी, पालनकर्ता,  संरक्षणकर्ता असलेल्या विष्णूचे हे कार्य होते. त्याने या सर्व रूपांमध्ये प्राण फुंकले आणि पुराणे म्हणतात त्याप्रमाण सर्व रूपांमध्ये प्राण बनून त्यांना चैतन्य प्रदान केले. त्यानंतर समग्र  ब्रम्हांड प्राण आणि चैतन्याने युक्त बनले. परंतु जेव्हा मानव या स्थळी उपस्थित झाला तेव्हा हे पुरेसे नव्हते. ईश्वराच्या तीन अंशानपैकी  दोघांनी आपले जीवन दिले होते, परंतु जो वस्तूंच्या रूपाचा संहार करतो आणि जीवांना मुक्त करतो, मिलन होण्यासाठी व आनंदासाठी जीवांना बोलावतो अशा तिसऱ्या अंशाचे कार्य अजूनही शिल्लक राहिलेले होते. जीवांना  पूर्णत्वास प्रदान करण्यासाठी महादेवाने आपले कार्य करणे अजूनही राहिले होते. हे कार्य पूर्ण झाले आणि मानवी जीवनाच्या क्रमविकासाच्या यात्रेला प्रारंभ झाला. खनिजे, वनस्पती, पशुपक्षी हे पहिल्या कल्पमाध्येच विकसित झाले होते. सृष्टीच्या उत्पत्तीच्या क्रमामध्ये सर्व प्रथम वनस्पती आणि प्राणी मग पुढे जाऊन मनुष्य त्यानंतर आत्मा प्रकाश आणि मृत्यू पासून अमरत्वाच्या इच्छेपर्यंतच्या मानवी उत्क्रांतीचे अतिशय सुंदर वर्णन विद्यार्थ्यांनी ऐतरेयारण्यकात* [3]वाचले असेल. आणि ते प्रगत पुस्तकांमध्येही आढळू शकेल.

               विशेषत:  विष्णूचे प्रकटीकरण ज्याला अवतार म्हटले जाते ते विसरता कामा नये.
या शब्दाचा अर्थ जो
तृ- अर्थात पार करणे आणि  'अव' उपसर्ग उतरणे असा अर्थ होतो. विशिष्ट प्रकारच्या दैवी प्रकटीकरणांसाठी हे लागू केले जात असून यात विशेष परीणाम साधण्यासाठी देवता अवतार धारण करतात. जगात जेव्हा विपरीत वाईट गोष्टी घडू लागतात आणि जगाला उत्क्रांतीच्या योग्य मार्गावर ठेवण्यासाठी विशेष मदतीची अपेक्षा असते तेव्हा  विष्णू अवतार घेतो. काळानुसार एक शरीर धारण करून अवतरीत होऊन जीवन चक्र सुस्थितीत ठेवतो. त्याचे दहा अवतार महत्वाचे मानले जातात त्यालाच "दशावतार" असेही म्हटले जाते. ते अवतार याप्रमाणे -

. मत्स्य अवतार - वैवस्वत मनुने एकदा पाण्याच्या शोधात तडफडणाऱ्या माशाला पाहिले आणि एका मोठ्या भांडयात त्याला ठेवले. नंतर तो मासा मोठा झाला मग त्याने मोठ्या भांड्यात ठेवले. अजून मोठा झाल्यावर त्याला टाकीत, तलावामध्ये, नदीत, समुद्रात स्थानांतरीत केले. हे सर्व पाहून मनुला कळले की हा मासा त्याच्या स्वतःच्या जीवन कार्याशी जोडला गेला आहे. आणि एका मोठ्या प्रलयाच्यावेळी जीवन वाचवण्याची त्याच्यावर वेळ आली तेव्हा मनुने ऋषी आणि जीवनावश्यक गोष्टींसह एका जहाजात प्रवेश केला, त्यावेळी तो महाकाय मासा त्याला दिसला आणि त्या माशाने ते जहाज विश्वाकडे वळवले- जेथे मनूचे कार्य सुरू होते. माश्याच्या येण्याने जगातील प्राणी जीवनाच्या उत्क्रांतीची सुरुवात झाली.

.कूर्म अवतार  - कूर्म रूपात विष्णूने समुद्र मंथनामध्ये वापरण्यात आलेल्या पर्वताला आपल्या पाठीवर धारण केले जेणेकरून जीव जगताची रूपे प्रकट होतील. याप्रकारे हा अवतार विकासाच्या क्रमातील पुढचा चरण ठरला.

.वराह अवतार - पृथ्वी जेव्हा पाण्याखाली बुडाली होती तेव्हा विष्णूने वराहरूपात येऊन पृथ्वीला वर काढले. आणि सस्तन प्राण्यांच्या रूपाने पृथ्वीवर  राहू लागले.

आधुनिक विज्ञान या तिन्हींना उत्क्रांतीचे महत्त्वाचे टप्पे म्हणून ओळखते. ज्यातील प्रत्येक टप्पा हिंदू धर्मात अवतार म्हणून चिन्हांकित केला गेला आहे.

. सिंह अवतार - पृथ्वीला दैत्यांच्या अत्याचारापासून मुक्त करण्यासाठी हा अवतार झाला होता. दैत्य कुळात प्रल्हाद नावाच्या एका मुलाचा जन्म झाला. जो मुलगा लहानपणापासून विष्णूभक्त असूनही त्याच्या क्रूर पित्याचा छळ सहन करत होता. वडिलांनी मुलाला वारंवार मारण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी त्याला वाचवण्यासाठी विष्णू आलाच. शेवटी एक खांबातून नर सिंहरूपात  विष्णू प्रकट झाले आणि त्या दैत्य राजाचा वध केला.

. वामन अवतार (बटू) त्यानंतर विष्णू मानव जातीच्या उत्क्रांतीस मदत करण्यासाठी तो मानवी रुपात आला. आणि बळी राजाकडून तीन पावले भूमी दान स्वरुपात प्राप्त होण्याची विचारणा केली. समग्र विश्व तीन पावलांमध्ये व्यापून टाकले. पहिल्या पावलाने पृथ्वी व्यापली. अशाप्रकारे मानवी उत्क्रांतीचे क्षेत्रात मुक्त केले.

. परशुराम अवतार - हा अवतार लोकांवर अत्याचार करणाऱ्या क्षत्रियांना शिक्षा देण्यासाठी आणि वाईट राज्यकर्त्यांना सहाय्य करण्या ऐवजी प्रजेचा छळ केल्यास त्याचा कार्य परिणाम होतो हे दर्शवणासाठी झाला होता.

. राम अवतार - ज्याला सहसा रामचंद्र असे संबोधले जाते, दशरथाचा पुत्र तो आपल्या तीन भावांसह एक योद्धा,आदर्श राज्यकर्ता, परिपूर्ण मानवी जीवनाचे उत्तम उदाहरण म्हणून नजरे समोर येतो. आज्ञाधारक आणि प्रेमळ पुत्र, सुकुमार पति, मायाळू भाऊ, धाडसी योद्धा, कुशल शासक, आपल्या प्रजेचा उद्योगी संरक्षणकर्ता प्रभावशाली उत्तम व्यक्ती होय. त्याची भव्य कथा वाल्मिकी रामायणात सांगितलेली आहे. याचीच तुलसीदासांनी रचलेली सुंदर आवृत्ती तर उत्तर भारतातील प्रत्येक घरात ज्ञात आहे.

.कृष्ण अवतार - दैवी प्रेम आणि ज्ञान यांचे प्रकटीकरण होय. असंख्य भक्तांकडून तळमळीने तो पूजीला जातो. ब्रज आणि वृंदावनचा अद्भुत पुत्र, अर्जुनाचा सखा, भगवद्गीतेचा वक्ता म्हणून, पांडवांचा उत्तम ज्ञानी सल्लागार म्हणून, भीष्मांचे आराध्य  म्हणून, कोणत्या भारतीय मुलाला याची कथा माहित नाही बरे महाभारतातील मध्यवर्ती प्रतिमा असून त्याचे जीवन अनेक पुराणांमध्ये पहावयास मिळते.

. बुद्ध अवतार - सुकुमार राजपुत्र ज्याने सत्याचा उपासक, प्रवासी भिक्षू होण्यासाठी सिंहासन व ऐषोआरामाचा त्याग केला. ते शाक्य-मुनी म्हणून ओळखले जातात, गौतम, सिद्धार्थ आणि लाखो मानवांदारे श्रद्धेने अनुसरण केल्या जाणाऱ्या मार्गाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. या अवतारात विष्णूने अनेक आर्येतर लोकांना शिकवले.

१०. कल्की या अवताराचा अविर्भाव अजून झालेला नाही. कलियुगाच्या नजीकचा आणि जो भविष्यात होणार आहे अशावेळेस जेव्हा हा अवतार प्रकट होईल तेव्हा पुन: पृथ्वीवर सत्ययुग अवतरेल, एक नवे चक्र सुरू होईल. मानवांचा विकास आणि परिपूर्णता या अवतारांद्वारे दर्शविली जाते.

 

(संदर्भ: १९१६ साली Central Hindu College Banaras येथून प्रकाशित झालेल्या SANATAN DHARMA AN ELEMENTARY TEXTBOOK - OF HINDU RELIGION AND ETHICS या मूळ इंग्रजी पुस्तकातील अनुवाद क्रमशः...)

[1] * गीता Xiv, xvi, xviii

[2] * कर्माचे सविस्तर विवरण चौथ्या अध्यायात केले आहे.

[3] * ऐतरेय आरण्यक II,iii-2

Comments

Popular posts from this blog

राराजतां संस्कृतम् (Imporance of Sanskrit Lanuage

वास्तुशास्त्र में प्रतिमा-मूर्ति कला विज्ञान

Gambling and its regulation: a History through Sanskrit Literature